आषाढी एकादशी
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची
वारी ! २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या
व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात. आषाढी एकादशी
व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.
विठ्ठल
१. प्रकार
आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.२. इतिहास
‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.३. महत्त्व
अ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.
आ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.
४. व्रत करण्याची पद्धत
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला
प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण
करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा
करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने
श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
५. पंढरपूरची वारी
हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा
वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक,
सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी
केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
अ. पंढरपूरची वारी म्हणजे हिंदू कुटुंब आणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत !
पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत असून वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळपासून ही वारी चालू आहे. वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,
‘संतकृपा झाली इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया ।
उभारीले देवालया ।।
नामा तयाचा हा किंकर ।
तेणे केला हा विस्तार ।
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।।’
येथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ।’ याचा अर्थ संत
ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे.
पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांत एकोपा वाढण्यास हातभार
लागला आहे. व्रतांचे हे सामाजिक महत्त्व झाले. प्राध्यापक न. र. फाटक
म्हणतात, ‘महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी संघटना
ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात होती, तिचे शैथिल्य, कर्त्या
पुरुषांच्या अभावी संघटनेला आलेले दैन्य एकनाथांच्या शिकवणीने नाहीसे झाले.
लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उल्हास संचारला अन् यालाच पुढे
पन्नास वर्षांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांचे फळ येऊन त्याचा परिपाक
महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला.’
आ. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच
भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती
आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील
चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा,
अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते.) आपले
अनुभव सांगत. नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या
नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात
उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात
आजतागायत चालू आहे. थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी
एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील
मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त
झाले.’
No comments:
Post a Comment